मुंबई: पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणात कोर्टाने राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेली कारवाई चुकीची असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? गृहमंत्र्यांवर कारवाई करणार की मुख्यमंत्री स्वत: माफी मागणार?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. (devendra fadnavis slams thackeray government over court decision)
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. यावेळी गोस्वामी आणि रणौत प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालातील उतारेच्या उतारेच फडणवीस यांनी वाचून दाखवले. ठाकरे सरकारच्या एका वर्षाच्या कामाची कार्यपुस्तिका म्हणजे काल आलेले कोर्टाचे हे दोन निर्णय आहेत. या दोन्ही प्रकरणात सरकार सूडबुद्धीने कसे वागले हे त्यातून अधोरेखित झाले आहे. सरकारने दोन्ही प्रकरणात सरकारी तंत्राचा गैरवापर केल्याचं या दोन्ही निर्णयातून स्पष्ट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकार विरोधात बोलाल तर तुरुंगात टाकू ही दमनकारी नीती सरकारने वापरल्याचंही या निकालातून स्पष्ट होत असल्याचं सांगतानाच हे दोन्ही निकाल आले आहेत. आता मुख्यमंत्री कुणावर कारवाई करणार? या गोष्टीला कुणाला जबाबदार धरणार? गृहमंत्र्यांवर कारवाई करणार? अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? की मुख्यमंत्री स्वत: माफी मागणार?, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.
सरकारमध्ये असलेल्या लोकांवर टीका होतच असते. माझ्या पत्नीवरही बरीच टीका झाली. शिवसेनेचे अधिकृत नेते म्हणवून घेणाऱ्यांनीही टीका केली. ट्विटरवर हे लोक काय बोलले हे सर्वांना माहीत आहे. पण मी कधी कांगावा केला नाही. आम्ही कधीही कुणाच्या घरावर हल्ला केला नाही. मात्र, तुम्हालाही मुलंबाळं आहेत, असं सांगून धमकावणारे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधानांकडे खुशाल तक्रार करा
मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखे वागावे. ते तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातूनही दिसलं पाहिजे, असं सांगतानाच पंतप्रधानांकडे तक्रारी केल्या तरी आम्ही रस्त्यावर उतरणारच. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. आम्ही आमचं काम करू. तुमच्या नाकर्तेपणामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.
read more –