“ऐकू पण नये असली लोकं आहेत ही”

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी एक विधान केलं होतं. त्या राजकीय विधानावरून बराच राजकीय वाद रंगला. पाटील यांनी पवारांविषयी केलेल्या विधानाबद्दल संजय राऊत यांनी अभिनंदन मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांचं मत जाणून घेण्यासाठी प्रश्न केला. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला.
“शरद पवार हे देशातले, राज्यातले एक प्रमुख नेते आहेत…प्रदीर्घ काळ त्यांचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शनसुद्धा सरकारला आहे. त्यांच्याविषयी भाजपाचे नेते सांगताहेत की, ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत. त्यांची कुवतच नाही, ते लोकनेतेच नाहीत,” असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी केलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”होय, आता त्यांना ८० वर्षे पूर्ण होत आहेत. जाऊ द्या हो… असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सीरियसली घेत नाही… ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. हा महाराष्ट्राचासुद्धा आणि आपल्या नेत्यांचाही अपमान आहे. बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात!,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
“मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता, मला चंपा म्हणतात ते चालतं का? मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून याबाबत भीती निर्माण केली जाते आहे. कालच्या ओबीसी मेळाव्यात यासंदर्भात बोलताना मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. पण तुम्ही मोदींबद्दल आणि माझ्याबद्दल बोलतात ते चालतं का? मी उद्धव ठाकरेंबद्दलही बोलतो. त्याबद्दल कधी शिवसेना बोलली नाही, राजकारणात असं बोललं जातं. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलू दे!” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.