Uddhav Thackeray करोना संकटात एकीकडे अनेक रोजगार हिरावले गेले असताना दुसरीकडे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. त्यावर बोट ठेवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
मुंबई:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांचे हातचे रोजगार गेले आहेत. त्याचवेळी नव्याने रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच या रोजगारांच्या अनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, असे महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण झाले त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘लॉकडाऊन काळातही विभागामार्फत एक लाख अठ्ठेचाळीस हजार रोजगार उपलब्ध केले आहेत ही चांगली बाब आहे परंतु लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीत जसे रोजगार निर्माण होतील त्याला अनुसरून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे काम विभागाने करावे. यासाठी सविस्तर असा कृती आराखडा लवकर तयार करण्यात यावा. तसेच ऑन जॉब प्रशिक्षण योजना कार्यान्वित करावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI ) नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत. कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याबाबत विचार करण्यात यावा.’